Wednesday 6 August 2014

दुष्काळाची पूर्वपरीक्षा …… ( भाग - २ )

     आता मान्सून आपल्याकडे चांगलाच स्थिरावलेला आहे .  पावसाच असमान वितरण आपल्याकडे नेहमीच पाहायला मिळत .  त्यातच एकीकडे माळीण सारख्या दुर्घटना घडत आहेत तर अजून बऱ्याच ठिकाणी अद्याप पावसाची फक्त प्रतीक्षाच आहे .  स्थिरावलेल्या या पावसाने लहान - मोठी धरणे बऱ्यापैकी  भरली आहेत . पण अजूनही  कायम दुष्काळी तालुक्यांची तहान भागली नाही .  या तालुक्यातील मोठी  पाणी साठवण क्षमता असणाऱ्या तलावांची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही . त्यामुळे अगोदरच पावसाचे कमी प्रमाण आणि पडलाच तर पाणी साठवण्यात अडचण …….  


                                - दत्ता माने . 


      या तालुक्यांमधील बहुतांश तलाव हे ब्रिटीश कालीन आहेत प्रामुख्याने नेर , मायणी , म्हसवड , पिंगळी  यांचा समावेश आहे . या तालुक्यातील बहुतांशी तलावांची कामे हि दुष्काळ पडल्यावर रोजगाराचा उपाय म्हणून करण्यात आली आहेत . राणंद , दरूज तलाव . कामे १९५२-५६ च्या दुष्काळात झाली आहेत . परंतु आपल्या कडे दुर्दैवाने प्रकल्पांची डागडुजी करण्याची कोणतीही यंत्रणा प्रत्यक्ष कार्यान्वित नसल्याने सध्या मायणी , राजेवाडी , नेर , आंधळी , म्हसवड या सारखे मोठी पाणी साठवण क्षमता असणारे तलाव बहुतांश गाळाने भरले आहेत त्यामुळे पाणी साठवण कमी प्रमाणात होत आहे, वेळीच त्यावर उपाययोजना करणे अपेक्षित आहे

गाळाने  भरलेला ब्रिटीशकालीन मायणी (खटाव ) तलाव 
      या तालुक्यांमधील प्रामुख्याने विहीर बागायत केली जाते . खटाव माण तालुक्यात सुमारे ११,२३६ सिंचन विहिरींची नोंद आहे परंतु भूजल पुनः भरणात महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या  पाझर तलावांची संख्या मात्र केवळ ३७४ आहे . त्यातही बहुतांश तलाव हे गाळाने भरलेले आहेत तर काहींची डागडुजी करणे गरजेचे आहे . त्याच बरोबर  विहिरींचा सर्व्हे करून आणि भूगर्भ आणि भूरूप शास्त्राच्या आधारे नवीन पाझर तलाव बांधणे क्रमप्राप्त आहे . शंभू महादेवाची डोंगर रांग सीतामाई , औंध , खानापूरचे पठार  इत्यादी डोंगर रंगांमध्ये  लोकसहभागातून पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे क्रमप्राप्त आहे . त्या संदर्भात लोधवडे , निढळ  या गावांना रोल मॉडेल म्हणून पाहता येईल. जलसिंचनाचा कुठलाही शास्वत पर्याय या तालुक्यांमध्ये उपलब्ध नसल्याने विहिरी , बोअरवेल या माध्यमातून भूजल उपसण्याचे  प्रमाण वाढले आहे . २०१०- २०११ च्या आकडेवारी नुसार खटाव तालुक्यात १६८९ तर माण तालुक्यात १५०९ बोअरवेल आहेत . सेन्ट्रल ग्राउंड वाटर बोर्डाच्या २००९ च्या अहवालानुसार खटाव तालुका रेड झोन मध्ये होता परंतु सध्य स्थितीला भूजल पातळी निश्चित पणे खालावली गेली असेल हे स्पष्ट आहे . या तालुक्यांमध्ये फक्त शेतीसाठी जल सिंचनाचा प्रश्न नसून पिण्याच्या पाण्या बाबतही भयावह अवस्था आहे . या तालुक्यातील बहुतांश गावांना प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आहेत . त्यासुद्धा छोटे तलाव , धरणे यावर अवलंबून असल्याने पिण्याच्या पाण्याची पायपीट हि नित्याची बाब झाली आहे . सार्वजनिक विंधन विहिरी , बारव , शिवकालीन पाणी साठवण योजना , हे पारंपारिक जल स्त्रोतांचे पर्याय नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत . आटपाडी या गावातील आड हि त्या गावाची ओळख आता नामशेष  झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भूजल पातळी विस्कळीत झाली असून गावागावांच्या स्वयंपूर्ण जल संस्कृतीच नष्ट होत आहेत . त्यासाठी रेनवाटर हार्वेस्टिंग , बोअरवेल रिचार्ज , चेकडम इत्यादी पर्यायांचा वापर करून भूजल पातळीत गुणात्मक वाढ करणे हि प्रमुख जबाबदारी असेल त्यासाठी गरज आहे ती जलसाक्षरतेची.
         दुष्काळ निवारण्यासाठी  किंवा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्यास शासकीय पातळीवर उदासीनता असून राजकीय इच्छा शक्तीची कमतरता आहे . गाव टंचाई ग्रस्त घोषित व्हावे , पाण्याचा टंकर  सुरु व्हावा यासाठी आंदोलन करण्याची वेळ यावी हि दुर्दैवाची गोष्ट आहे . टेंभू उपसा सिंचन योजनेचे फेर पाणी वाटप करण्यासाठी सुद्धा न्यायालयीन लढाई लढावी लागत आहे . माजी आमदार डॉ . दिलीपराव येळगावकर यांनी  केलेली  दुष्काळी तालुक्यांच्या महामंडळाची मागणी  हि रास्त होती किंबहुना आहे . कारण दुष्काळात होरपळनाऱ्या  जनतेची शासनाने नेहमीच प्रतारणा केली आहे . कृष्ण - भीमा स्थिरीकरण योजना असो किंवा टेंभू योजना असो किंवा साखळी बंधारे असोत शेवटी जनता हि तहानलेलीच . स्थानिक जलस्त्रोतांचा  विकास आणि भूजल पातळीत गुणात्मक वाढ करणे,उपसा जल सिंचन योजनांच्या पाणी वाटपाचे  सर्वसमावेशक नियोजन आणि लोकसहभागातून पाणलोट विकासाचा पथदर्शी प्रकल्प प्रभावी पणे राबवणे हे आव्हान आजच्या भगीरथ होऊ पाहणाऱ्या राज्यकर्त्यांपुढे  आणि  पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या जनतेपुढे आहे.

Monday 14 July 2014

दुष्काळाची पूर्वपरीक्षा …… (भाग -१)

          नेहमीच अंदाज चुकवणारा मान्सून आता येण्याची चाहूल देत आहे …  मान्सूनच्या येण्याचे आपण फक्त अंदाजच बांधू शकतो … त्याच्या प्रतिक्षेनंतर आता पाऊस पडेल या आशेवर आपण आहोत ,पण त्याच्या येण्याची खरचं आपली तयारी झाली आहे ???
     "तहान लागल्यावर विहीर खणायची" हि तशी आपली जुनीच सवय , त्याला दुष्काळ तरी कसा अपवाद ठरणार.  येणाऱ्या मान्सूनच  स्वागत करताना जुन्याच गोष्टींचे संदर्भ नव्याने तपासणे खूप निकडीच वाटत..


          -  दत्ता माने


हे चित्र आपल्याला फारस नवीन नाही .

      विकासाच्या रोल मॉडेलकडे वाटचाल करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील  पूर्वेकडील माण , खटाव , सांगोला , आटपाडी या तालुक्यांची कायम दुष्काळी तालुके हि ओळख विकासावर प्रश्न चिन्ह उभे करणारी आहे . कमी पर्जन्यमाना मुळे  जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य हेच ज्वलंत वास्तव या तालुक्यात पहावयास मिळते . या तालुक्यांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या पाणी प्रश्नावरून आतापर्यंत निवडणुका लढवणारे आणि पाण्याच्या श्रेयवादावरून एकमेकांना शह देणारे राज्यकर्ते आणि दिशाहीन जनता सातत्याने पडणाऱ्या दुष्काळातून काहीच शिकले नाहीत , आणि जे शिकले अशा भगीरथांची पाटी कोरीच राहिली . गेल्या वर्षीचा साखळी बंधारे बांधण्याचा निर्णय हा शासनाचे " वरातीमागून घोडे " असाच होता .

            दुष्काळावर केवळ उरमोडी , जिहे कठापूर आणि टेंभू . प्रकल्प हाच एकमेव उपाय असल्याचे चित्र गेली काही वर्षे जनतेसमोर उभे केले गेले आहे . या योजना  पाण्यासाठी निश्चित हिताच्या आहेत परंतु या योजनाचा इतिहास आणि भविष्यात संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी याचा विचार करता स्थानिक पातळीवर अन्य जलस्त्रोतांचा विकास करणे  गरजेचे आहे . त्याकरिता या तालुक्यांचे भौगोलिक स्थान उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा  अभ्यास करून   नियोजनबद्ध वापर केल्यास पाण्यासाठीचा संघर्ष निश्चितपणे टाळता येऊ शकतो . परंतु  दुष्काळी भागातील जलसंधारणाचा  धोरणात्मक विचार करण्याची कुठलीही तसदी प्रशासनाने किंवा राज्यकर्त्यांनी घेतली नाही . दुष्काळावरच्या  केलेल्या उपाययोजना या तात्पुरत्या आणि कुचकामी ठरल्या आहेत आणि सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने जनता त्रस्त आहे . पर्यायाने निधी पाण्यासारखा वाहून गेला आहे . बंधारे बांधत असताना  त्याची जागा , साठवण क्षमता , ओलिता खाली येणारे क्षेत्र , भूगर्भ रचना आणि पाण्याचा प्रभावी वापर   किमान या मुलभूत घटकांचा  तरी विचार होण अपेक्षित होत परंतु साखळी बंधारे बांधताना प्रशासनाने आपली दिवाळखोरीच दाखवली, लोक सहभाग दूरच राहिला . एकूणच दुष्काळ निवारणार्थ केलेल्या या योजनेची परिस्थिती  आंधळ दळतय…… अशीच झाली आहे .
            दुष्काळाचे निवारणार्थ आणि पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी या तालुक्यातील भोगोलिक स्थान  , जल प्रणाली , भूरुपीय विस्तार आणि भूगर्भ यांचा सूक्ष्म अभ्यास करून स्थानिक पातळीवर जल संवर्धन  करून योजना कार्यान्वित करणे गरजेचे वाटते .
      पर्ज्यन्यछायेच्या प्रदेशात येणाऱ्या या  तालुक्यांमध्ये सरासरी ३०० ते ४०० मिमी. पाऊस पडतो . शंभू महादेवाच्या डोंगररांगेतील  सीतामाई , औंध , माहीमानगड , खानापूरचे पठार या मुख्य जलविभाजाकांमुळे येरळा आणि माणगंगा या दोन मुख्य नद्यांच्या खोऱ्यात  हे तालुके विकसित झाले आहेत . परंतु या नद्या बारमाही नसल्यामुळे त्यांचा जल सिंचनासाठी फारसा उपयोग होत नाही . हे आपल्या नियोजनावर लागलेलं सर्वात मोठ्ठ प्रश्न चिन्ह आहे ......